Pune PMC Vs Pune Irrigation | पाटबंधारे विभागाच्या भूमिकेवर महापालिका आयुक्त नाराज!
| पाणी वापर कमी करण्याबाबत पाटबंधारे विभाग आक्रमक!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचा पाणी वापर जास्त आहे आणि तो वापर कमी केला पाहिजे, याबाबत पाटबंधारे विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र पाटबंधारेच्या या भूमिकेवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आपली नाराजी दर्शवली. त्यामुळे आयुक्तांकडे पाटबंधारे विभागाची होणारी बैठक आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवली. अतिरिक्त आयुक्तांनी देखील सद्यस्थितीत पाणी वापर कमी न करता पाणी वापर कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचा अहवाल पाटबंधारे विभागाला सोपवला जाईल, असे आश्वासन देत बैठक संपवली. (PMC Water Supply Department)
पुणे पाटबंधारे विभाग आणि महापालिका आयुक्त यांच्यात पाण्याची थकबाकी आणि पाणी वापर याबाबत मागील दोन दिवसापूर्वी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणाने ही बैठक होऊ शकली नाही. ती बैठक आज ५ वाजता आयोजित करण्यात आली होती. महापालिका आयुक्त यांना अपेक्षित होते की समाविष्ट गावे, शहराची वाढत असलेली लोकसंख्या यामुळे मुळशी धरणातील पाणी देण्याबाबत पाटबंधारे विभाग काही चर्चा करेल, मात्र पाटबंधारे विभाग पाणी वापर कमी करण्याबाबत प्रस्ताव घेऊन आला आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांना दिली. यावर महापालिका आयुक्तांनी नाराजी दर्शवत पाटबंधारे विभागासोबत बैठक न घेता याची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांच्याकडे सोपवली.
त्यानुसार अतिरिक्त आयुक्त, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी यांच्यात ही बैठक झाली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता यांनी पाणी वापर कमी करण्याबाबत मुद्दा मांडला. त्यांनी युक्तिवाद केला कि, MWRRA च्या मापदंड नुसार पाणी वापर कमी करणे, महापालिकेला बंधनकारक आहे. यावर पाणीपुरवठा विभाग प्रमुखांनी सांगितले कि, वॉटर बजेट मध्ये समाविष्ट गावांना १.७० टीएमसी पाणी देण्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. यामुळे पालिकेला आरक्षित पाणी कोटा कमी मिळला आहे. यावर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि, या मुद्द्यापेक्षा पाणी वापर कमी करणे हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे त्याला बगल न देता त्यावर चर्चा व्हायला हवी.
यावर अतिरिक्त आयुक्त चंद्रन यांनी सांगितले कि, आम्ही पाणी वापर कमी करण्याबाबत नियोजन केले होते. त्यानुसार काम सुरू आहे. मात्र मधील काळात गणपती उत्सव होता. त्या काळात आम्ही पाणी कमी करू शकलो नाही. काही ठिकाणी जेव्हा पाणी कमी केले तेव्हा तेथील लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांची ओरड सुरू झाली. त्यामुळे आम्ही कुठे पाणी कमी करू नाही शकत. मात्र याबाबत ज्या उपाययोजना केल्या आणि करू याबाबत आपल्याला अहवाल दिला जाईल, असे अतिरिक्त आयुक्तांनी पाटबंधारे विभागाला सांगितले.
– पाटबंधारे विभाग आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार?
दरम्यान MWRRA च्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाने आपल्या अधिकाऱ्यांना आदेशित केले होते की, महापालिकेची पाणी वितरणची व्यवस्था आपल्या ताब्यात घ्यावी. मात्र महापालिकेने अजून तरी अशी कुठली व्यवस्था हस्तांतरित केलेली नाही. यावरून पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता यांनी आपल्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे की, ही व्यवस्था ताब्यात का घेतली नाही. वितरण व्यवस्था ताब्यात घेतली नाहीतर कारवाई करण्याचा इशारा देखील मुख्य अभियंता यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
—-
पाटबंधारे विभागाने पाणी वापर कमी करण्याबाबत भूमिका घेतली आहे. मात्र आम्ही गणपती उत्सवामुळे पाणी कमी करू शकलो नाही. शिवाय पाणी कमी केले तर टेल एंड च्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. मात्र पाणी वापर कमी करण्याबाबत आम्ही काय प्रयत्न केले आणि काय उपाययोजना केल्या याचा अहवाल आम्ही पाटबंधारे विभागाला सादर करणार आहोत.
– एम जे प्रदीप चंद्रन, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा.

COMMENTS