Vitthal Raje Pawar | “इंदापूर तहानलेला, शेतकऱ्यांची फसवणूक” – शेतकरी संघटनेचा पुणे महापालिका व लोकप्रतिनिधींविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा
Pune Water Issue – (The Karbhari News Service) – खडकवासला धरण साखळीतील २९.५२ टीएमसी पाण्यापैकी शेतीसाठी १२ टीएमसीचा करार असतानाही इंदापूर तालुक्यातील शेतकरी पाण्याविना होरपळत आहेत, असा आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी केला आहे. (Pune District Water News)
पुणे महापालिकेला सुरुवातीला ५.५ टीएमसी पाण्याचा करार होता, तो बेकायदेशीरपणे १०.५ टीएमसीपर्यंत वाढवला गेला. आता महापालिका आणि विस्तारित कार्यक्षेत्राला १६ टीएमसीपेक्षा अधिक पाणी दिले जात आहे. यामुळे इंदापूर, दौंड, हवेली आणि बारामतीच्या २३ गावांसाठी असलेला ६ टीएमसी पाण्याचा करार मोडीत निघाला, असा दावा पवार यांनी केला.
यंदा जानेवारीपासूनच इंदापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. वेळेवर पाणी न मिळाल्याने हजारो हेक्टरवरील ऊस, फळबागा आणि इतर पिके करपली. यामुळे शेकडो कोटींचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या २५० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोपही त्यांनी केला. या सर्व मुद्द्यांवर पुणे महापालिका, अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधींविरुद्ध न्यायालयीन लढा उभारण्याचा निर्णय संघटने घेतला आहे. “शेतकऱ्यांचा पाण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्यांना न्यायालयात जाब द्यावा लागेल,” असा इशारा पवार यांनी दिला.

COMMENTS