Sinhgadh Road Ward Office | सिंहगड रोड परिसरात ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ अंतर्गत भव्य श्रमदान!
PMC Solid Waste Management – (The Karbhari News Service)- पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामार्फत ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता. २५) ‘एक तास – एक साथ श्रमदान’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या मोहिमेत सिंहगड रोड परिसरातील एकूण आठ ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. (Pune PMC News)
या उपक्रमात तब्बल १ हजार नागरिकांनी सहभाग नोंदवला. विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक, सामाजिक संस्था, स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत परिसर स्वच्छतेसाठी एकजुटीने श्रमदान केले. मोहिमेतून २७०० किलो ओला कचरा व सुमारे ४ टन राडारोडा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांनी केले. त्यांना वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार व मंगलदास माने यांनी सहकार्य केले. या वेळी माजी नगरसेविका ज्योती गोसावी, माजी नगरसेवक प्रसन्नदादा जगताप, स्वच्छ ब्रँड अँबेसेडर अविनाश निमसे, जीवित नदी फाउंडेशनच्या अश्विनी भिलारे, विविध स्वच्छता संस्था, मनपा सफाई कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना महापालिका सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार म्हणाल्या की, “स्वच्छ परिसर निर्माण करण्यासाठी केवळ महानगरपालिका नाही तर नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने जबाबदारीने पुढे आल्यास आपल्या शहराचा चेहरा बदलू शकतो. ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम म्हणजे नागरिकांना जागरूक करण्याचे व सामूहिक सहभागातून पुणे अधिक स्वच्छ करण्याचे प्रभावी माध्यम आहे.”
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनीही स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली. “स्वच्छ परिसर हा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. सामूहिक प्रयत्नांतूनच ‘स्वच्छ पुणे – सुंदर पुणे’ हा संकल्प साकार होईल,” असे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
या मोहिमेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व नागरिकांनीही स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. “साफसुथरा परिसर म्हणजे आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली,” अशी भावना व्यक्त करत भविष्यातही अशा उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याची ग्वाही दिली.
सिंहगड रोड परिसरात झालेल्या या उपक्रमामुळे केवळ कचरा व राडारोडा हटविण्यात आला नाही तर स्वच्छतेबाबत सामूहिक जबाबदारीची जाणीव नागरिकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून वातावरणात स्वच्छतेचा सकारात्मक संदेश पोहोचला.

COMMENTS