Pune News | पुण्यासाठी 25 टीएमसी पाणी कोटा द्या | महापौर मंजुषा नागपुरे यांची जलसंपदामंत्र्यांकडे आग्रही मागणी
खडकवासला धरणसाखळीतील गाळ काढा
Pune Water Supply – (The Karbhari News Service) – पुणे शहराच्या भविष्यातील वाढत्या पाणी आणि वाहतूक गरजा लक्षात घेऊन पुण्यासाठी 25 टीएमसी पाणी कोटा मंजूर करावा. तसेच खडकवासला धरणसाखळीतील गाळ काढून जलसाठा क्षमता वाढवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी आग्रही मागणी महापौर मंजुषा नागपुरे यांनी राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. महापौरांनी मुंबई येथे जाऊन मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन शहरासंबंधी विविध प्रलंबित विषयांवर चर्चा केली. (Mayor Manjusha Nagpure)
बैठकीत महापौरांनी पुण्याच्या विकासासाठी चार प्रमुख मागण्या मांडल्या.
पहिली मागणी पाण्याच्या कोट्याबाबत होती. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहराच्या विस्तारामुळे पुण्याला सध्या मिळणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने पुण्यासाठी 25 टीएमसी पाणी कोटा तातडीने मंजूर करावा, असे महापौरांनी सांगितले.
दुसरी महत्त्वाची मागणी खडकवासला धरणसाखळीच्या पुनरुज्जीवनाबाबत होती. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गाळ साचल्याने जलसाठा क्षमता कमी झाली आहे. ही क्षमता पूर्ववत करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि त्यासाठी जलसंपदा विभाग, महापालिका आणि संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, अशी सूचना महापौरांनी केली.
तिसरा मुद्दा मुळा-मुठा नदीच्या संवर्धनाचा होता. नदीतील वाढते प्रदूषण, गाळ आणि दरवर्षी होणारी पूरस्थिती लक्षात घेऊन राज्यस्तरीय मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन मिशन स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली. या मिशनच्या माध्यमातून नदीतील गाळ काढणे, सांडपाणी प्रक्रिया, प्रदूषण नियंत्रण आणि पूर व्यवस्थापनासाठी एकात्मिक आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असे महापौर म्हणाल्या.
चौथी मागणी धायरी परिसरातील वाहतुकीशी संबंधित होती. या भागात वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित दोन पुलांच्या बांधकामास जलसंपदा विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र तातडीने मंजूर करण्यात यावे, अशी विनंती महापौरांनी केली. हे पूल झाल्यास धायरी आणि लगतच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भेटीनंतर बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, पुणेकरांना शाश्वत पाणीपुरवठा, कोंडीमुक्त रस्ते, सुरक्षित जलस्रोत आणि स्वच्छ मुळा-मुठा नदी मिळणे ही काळाची गरज आहे. शहराच्या विकासाशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून त्यावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठीच ही भेट घेतली.
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापौरांनी मांडलेल्या सर्व मागण्या सकारात्मकरित्या ऐकून घेतल्या. तसेच संबंधित विषयांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती महापौरांनी दिली.

COMMENTS