Shivsena UBT on BJP | सत्ता हातात असताना आंदोलन कशासाठी? खड्ड्यांच्या राजकारणावरून शिवसेना ठाकरेंचा भाजपला सवाल
सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे – प्रशासनाला निर्देश देऊन प्रश्न सोडवा
Pune Potholes – (The Karbhari News Service) – शहरातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास या गंभीर समस्या असल्या तरी राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना त्याच पक्षाच्या नेत्यांनी आंदोलनाची भूमिका घेणे हे अनेक नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारे आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे यांनी केली आहे. (Gajanan Tharkude UBT Shivsena Pune)
याबत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सत्ताधारी पक्षाने निर्देश द्यावेत
पत्रात थरकुडे यांनी म्हटले आहे की, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनाऐवजी प्रशासनाला निर्देश देऊन प्रश्न सोडवण्याची अपेक्षा जास्त असते.
“सत्ता हातात असताना आंदोलनाची भाषा करण्याऐवजी संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना जबाबदार धरून दर्जेदार आणि वेळेत काम करून घेणे हीच खरी लोकसेवा आहे,” असे थरकुडे यांनी म्हटले आहे.
नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते हवेत
नागरिकांना राजकीय आरोप-प्रत्यारोप किंवा आंदोलन नको तर खड्डेमुक्त रस्ते आणि सुरक्षित प्रवास हवा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने आंदोलनाऐवजी आपल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, हीच जनसामान्यांची अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पुणे शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापले आहे. एका लहान मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या कारभारावर सर्व स्तरांतून टीका होत आहे.
त्याच वेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही प्रशासनाविरोधात आंदोलनाची भूमिका घेतली होती. त्यावरूनच ठाकरे गटाने हा सवाल उपस्थित केला आहे. राज्यात आणि महापालिकेत सत्ता असताना रस्त्यांची कामे थेट करून घेण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांचीच आहे, असे थरकुडे यांचे म्हणणे आहे.

COMMENTS