Pune Property tax Abhay Yojana | अभय योजना धुडकावणाऱ्या 67,956 सराईत थकबाकीदारांवर कारवाई कधी? आयुक्तांना सजग नागरिक मंचचा सवाल
Pune Property tax – (The Karbhari News Service) – मिळकतकराच्या अभय योजनेचा वारंवार लाभ घेऊनही कर न भरणाऱ्या 67,956 सराईत थकबाकीदारांवर महापालिका प्रशासन कारवाई कधी करणार, असा थेट सवाल सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना पत्राद्वारे केला आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)
वेलणकर यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे महापालिकेने 15 नोव्हेंबर 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली होती. यापूर्वी 2020-21 तसेच 2021-22 मधील अभय योजनांचा फायदा घेऊनही पुन्हा एकदा थकबाकीदार झालेल्या सराईत थकबाकीदारांना या अभय योजनेचा फायदा देऊ नये, अशी विनंती आम्ही केली होती. मात्र उत्पन्नवाढीच्या उद्दीष्टाने पछाडलेल्या प्रशासनाने पुन्हा सराईत थकबाकीदारांना अभय योजनेच्या पायघड्या घातल्या. तरीही 67,956 थकबाकीदारांनी ही योजना धुडकावून त्यांना कसलेच भय वाटत नसल्याचे दाखवून दिले आहे.
माहिती अधिकारात उघड झालेली आकडेवारी करसंकलन विभागाने माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार:
2020-21 ची अभय योजना लाभ घेतलेले थकबाकीदार: 1,49,683
15 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा थकबाकीदार झाले: 67,475
नवीन अभय योजना जाहीर केल्यानंतरही कर न भरणारे: 42,696
2021-22 ची अभय योजना लाभ घेतलेले थकबाकीदार: 66,454
15 नोव्हेंबर 2025 रोजी पुन्हा थकबाकीदार झाले: 38,642
नवीन अभय योजना जाहीर केल्यानंतरही कर न भरणारे: 25,260
एकूण सराईत थकबाकीदार: 42,696 + 25,260 = 67,956
वेलणकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, प्रामाणिकपणे वेळेवर मिळकतकर भरणाऱ्या बहुसंख्य नागरिकांना यातून काय संदेश जातो याचा प्रशासनाने विचार करावा. वारंवार सवलत देऊनही कर न भरणाऱ्यांना कसलेच भय उरले नाही हे स्पष्ट झाले आहे. आग्रही मागणी अभय योजना धुडकावणाऱ्या 67,956 थकबाकीदारांवर महापालिका प्रशासन कधी आणि काय कारवाई करणार हे जाहीर करावे, अशी आग्रही मागणी वेलणकर यांनी केली आहे.
पुणे मनपाचे 2026-27 चे मालमत्ता कराचे उद्दिष्ट 2,800 कोटी रुपये आहे. 21 मे 2026 पर्यंत 740 कोटींची वसुली झाली असली तरी हजारो कोटींची थकबाकी कायम आहे. अभय योजनेत शास्ती व दंडाच्या रकमेत सवलत दिली जाते. मात्र वारंवार अभय योजनेचा लाभ घेऊनही थकबाकीदार राहणाऱ्यांमुळे प्रामाणिक करदात्यांमध्ये नाराजी आहे. आता प्रशासन जप्ती, लिलाव, नळ तोडणी यांसारखी कठोर कारवाई करणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS