CET Results | इंजिनीअरिंग, फार्मसी, अॅग्रीकल्चर CET निकालाला विलंब! | सजग नागरिक मंचाकडून मंत्री चंद्रकांत पाटलांकडे नाराजी
Sajag Nagrik Manch – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित इंजिनीअरिंग, फार्मसी आणि अॅग्रीकल्चर CET च्या निकालाला होणाऱ्या विलंबावर सजग नागरिक मंचाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून निकाल तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे. (Chandrakant Patil)
१० ते २० एप्रिल दरम्यान पहिली CET आणि १२ ते २१ मे दरम्यान दुसरी CET संगणकावर घेण्यात आली. मात्र, परीक्षा होऊन ५० दिवस उलटले तरी निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. संगणकावर झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करायला इतका विलंब का, असा सवाल वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.
वेलणकर म्हणाले, “यंदा महाराष्ट्र बोर्डाने १२ वीची लेखी परीक्षा १४ लाख विद्यार्थ्यांसाठी घेतली आणि ५० दिवसांत निकालही जाहीर केला. मात्र केवळ ७ लाख विद्यार्थी बसलेल्या संगणकीय CET चा निकाल ५० दिवसांनंतरही नाही.” शेजारील कर्नाटकात २३-२४ एप्रिलला झालेल्या CET चा निकाल ६ जूनला जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विलंब अक्षम्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बारावीचा निकाल लवकर लागूनही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या CET चा निकाल ३५ दिवसांनंतरही जाहीर न होणे हे विद्यार्थ्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे पुढील प्रवेशप्रक्रिया संथ गतीने चालते आणि महाविद्यालये सुरू व्हायला १५ ऑगस्ट उजाडतो, असेही त्यांनी नमूद केले.
NEET परीक्षेतील घोळामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच अस्वस्थता आणि संताप आहे. अशा परिस्थितीत CET चे निकाल लवकर लागणे अपेक्षित असल्याचे वेलणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

COMMENTS