Suhas Tingre on Civic Body | एनडीएमएअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या कामांना ब्रेक | नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाचा तीव्र निषेध! – सुहास टिंगरे
Pune Rain News – (The Karbhari News Service) – गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून तसेच मागील पाच महिन्यांपासून प्रत्येक स्थायी समितीच्या बैठकीत आणि सर्वसाधारण सभेत एनडीएमएअंतर्गत मंजूर करण्यात आलेली पावसाळी संरक्षणाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, सुमारे ₹१५० ते ₹२०० कोटींच्या वर्क ऑर्डरमध्ये संबंधित कामांचा स्पष्ट उल्लेख असूनही आजपर्यंत बहुतांश कामांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंगेस चे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी केली आहे. (Pune Breaking News)
टिंगरे यांनी सांगितले कि, पहिल्याच पावसात प्रभाग क्रमांक १ मधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. कलवड येथील इस्टरलिया सोसायटी, पोरवाल रोड येथील एलिमेंटो सोसायटी, हवालदार मळा येथील लेक शोअर सोसायटी तसेच एअरपोर्ट रोड वरील ५०९ चौक यांसह अनेक भागांमध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व ठिकाणच्या कामांचा वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट समावेश असूनही प्रत्यक्षात बहुतांश कामांना सुरुवात झालेली नाही.
यासोबतच अग्रेसन हायस्कूल शेजारील रस्त्यावर सुरू असलेल्या पावसाळी जलवाहिनी (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) टाकण्याच्या कामाची तसेच कॉमर झोन समोरील रस्त्याच्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी.कामाचीही तातडीने चौकशी करण्यात यावी. या कामांमध्ये दर्जाहीनता, विलंब किंवा नियोजनाचा अभाव आढळल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि जबाबदार यंत्रणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. नागरिकांच्या जीविताशी व सुरक्षिततेशी संबंधित अशा विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही.
या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, दिव्यांग नागरिक, रोजंदारीवर उदरनिर्वाह करणारा कामगार वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.
पहिल्याच पावसात निर्माण झालेली भयावह परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जर ही अवस्था असेल, तर पुढील चार महिने नागरिकांनी कसे जगायचे, हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाने तात्काळ जागे होऊन एनडीएमएअंतर्गत मंजूर सर्व कामे युद्धपातळीवर सुरू करून निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत. अन्यथा नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या निष्क्रिय आणि बेजबाबदार भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. असे देखील टिंगरे म्हणाले.

COMMENTS