Pune News | छत्रपती संभाजी महाराज यांच्या १० फुट उंचीच्या पूर्णाकृती कांस्य शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या वतीने संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आलेल्या बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. (
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, महापौर मंजुषा नागपुरे, उप महापौर परशुराम वाडेकर, सभागृह नेता गणेश बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महानगर पालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

*बुधभूषण ग्रंथ रचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाविषयी..*
■ छत्रपती संभाजी महाराज यांचे ‘बुधभूषण’ ग्रंथ रचतानाचे विश्वातील पहिले १० फुट उंचीचे पूर्णाकृती कांस्य शिल्प महाराष्ट्रात प्रथमच पुणे महानगरपालिकेच्यावतीने शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे उभारण्यात आले आहे. या प्रकल्पास एकूण ५ कोटी इतका खर्च झालेला आहे.
■ छत्रपती संभाजी महाराज यांचे “बुधभूषण” ग्रंथातील श्लोक निवडण्याकरिता इतिहास तज्ज्ञ, संस्कृत मराठी भाषा तज्ज्ञ, अभ्यासक यांची इतिहास तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीमार्फत छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या संस्कृत ‘बुधभूषण’ ग्रंथामधून आवश्यक श्लोक निवडण्यात आलेले आहेत.
■ ‘बुधभूषण’ संस्कृत ग्रंथ रचनाकार छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळा व महाराजांनी रचलेल्या ९ निवडक श्लोक मराठी व इंग्रजी अर्थासह तसेच बुधभूषण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह कोरण्यात आलेले आहेत. याकरिता भव्य १० दगडी भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. शिल्पाच्या भोवती रंगीत कारंजे, तसेच संपूर्ण परिसरात विविध शोभीवंत फुलझाडे लावण्यासह विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे.
■ अतिशय कठीण कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जगासमोर आणण्यासाठी महानगर पालिकेच्यावतीने देदीप्यमान शिल्प उभारण्यात आले आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असून या ठिकाणी भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महाराजांच्या गौरवशाली इतिहासापासूनची प्रेरणा मिळणार आहे.


COMMENTS