PMC GB Question Hour | लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीची महापालिकेच्या हेरिटेज वास्तूत नोंदच नाही!
| राज्य सरकार कडून वारसा जतन समिती स्थापन करण्याबाबत उदासीनता
Lahuji Vastad Salve – (The Karbhari News Service) – क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कर्मभूमीची म्हणजे तालीम आणि शाळा परिसराची पुणे महापालिकेच्या हेरिटेज वास्तूत नोंद नसल्याचे उघड झाले आहे. महापालिका प्रशासना कडून सांगण्यात आले कि हे काम वारसा जतन समितीचे आहे. ही समिती करण्याबाबत सरकार कडून निर्णय घेण्यात आलेला नाही. महापालिका आयुक्तांनी आश्वस्त केले कि आगामी महिन्याभरात हे काम पूर्ण केले जाईल. (Aishwarya Thorat BJP)
भाजप नगरसेविका ऐश्वर्या सम्राट थोरात यांनी याबाबत प्रशासनाला प्रश्न विचारला होता.
क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी १८२२ मध्ये पुण्यातील गंज पेठ येथे देशातील पहिले ‘क्रांतिकारी प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले होते, याची नोंद प्रशासनाकडे आहे का ? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या संगमवाडी येथील क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे ११५ कोटी रुपये खर्चाचे भव्य स्मारक उभारले जात असताना, त्यांच्या मूळ कर्मभूमीची (तालीम आणि शाळा परिसर) येथे दुरावस्था असून ह्या वास्तूस्थळाला आरक्षित करण्यासाठी प्रशासनानी काय ठोस पावले उचलली आहेत का ? किंवा या सामाजिक क्रांतीच्या स्मृतीला जपण्यासाठी त्या ठिकाणी काही विशेष फलक किंवा संग्रहालय उभारले जाणार आहे का? थोरात यांनी सांगितले कि, आम्ही १८२२ पासूनचे सर्व पुरावे प्रशासनाला दिले आहेत.
याबाबत महापालिका प्रशासन कडून सांगण्यात आले कि, हेरिटेज वास्तुंच्या यादीत “क्रांतीकारी प्रशिक्षण केंद्र” या वास्तुची नोंद नाही. कुठलीही जुनी वास्तू पुणे महानगरपालिकेच्या हेरिटेज यादीत समाविष्ठ करणेसाठी वारसा जतन समितीची मान्यता असणे गरजेचे आहे. वारसा जतन समितीची मुदत समाप्त झाल्यामुळे समितीची पुर्ननियुक्ती करण्याचा प्रस्ताव सध्या महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे. वारसा जतन समितीची पुर्ननियुक्ती झाल्यानंतर स्थळाच्या जतन व संवर्धनाबाबत आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येईल. असे प्रशासनाने सांगितले.
यावर विरोधी पक्षनेते निलेश निकम तसेच सभागृह नेते गणेश बिडकर यांनी समिती स्थापन करून लवकर प्रक्रिया करण्याची सूचना प्रशासनाला केली. यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी खुलासा केला. आयुक्त म्हणाले, समिती स्थापन करण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य सरकारकडे आहेत. महापालिकेचे फक्त शहर अभियंता त्या समितीत असतात. सरकारला आम्ही समिती स्थापन करण्याबाबत तीन स्मरणपत्रे दिली आहेत. ३० जून २०२५ ला समितीची मुदत संपली आहे. आयुक्तांनी पुढे सांगितले कि आम्हाला एक महिन्याची मुदत द्या आम्ही नोंद करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करू.

COMMENTS