Keshavnagar Water Supply | केशवनगर पाणीपुरवठा योजनेला गती ; १३५ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता!
| अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली माहिती
PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी केशवनगर (मुंढवा) येथे सुमारे १३५.५७ कोटी रुपयांच्या योजनेला गती देण्यात आली आहे. या कामासाठी स्थायी समितीने आज मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. (Chairman Shrinath Bhimale)
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, नव्याने समाविष्ट ३४ गावांपैकी केशवनगर भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली आहे. या भागात गेल्या काही वर्षांत वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे पाणीपुरवठ्यावर मोठा ताण आला आहे. सध्या अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, दररोज ३० ते ३५ टँकरची गरज भासत आहे.
प्रस्तावित योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिनी, पंपिंग यंत्रणा, जलवाहिन्यांचे जाळे आणि जल नलिकांमार्फत उभारण्याची कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये २०० ते ८०० मिमी व्यासाच्या सुमारे ६.१९ किमी लांबीच्या मुख्य जलवाहिनीचे काम, ६०० किलोवॅट क्षमतेची पंपिंग यंत्रणा, तसेच सुमारे ७१.५० किमी लांबीचे वितरण जाळे उभारले जाणार आहे. याशिवाय २.५ ते ३.५ एमएल क्षमतेचे सहा उंच जलकुंभ उभारण्याचाही समावेश आहे.
या कामांचा एकूण खर्च सुमारे ११४.६६ कोटी रुपये असून, त्यावर १८ टक्के जीएसटी आणि इतर शुल्क मिळून एकूण खर्च १३५.५७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात या योजनेसाठी पुढील तीन वर्षांत (२०२६-२७, २०२७-२८ आणि २०२८-२९) टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मात्र, सध्या उपलब्ध निधी इतर गावांसाठी वापरला गेल्याने केशवनगरसाठी स्वतंत्र तरतूद आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ७२ (ब) नुसार खर्चाचे दायित्व स्वीकारण्यासाठी मुख्य सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या पाहणीदरम्यान केशवनगरमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येची दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या योजनेला गती मिळाली.
नव्या गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करताना पाणीपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. केशवनगरमधील ही योजना पूर्ण झाल्यानंतर टँकरवरील अवलंबित्व कमी होऊन नागरिकांना नियमित आणि दाबाने पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यातील लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन या योजनेची आखणी करण्यात आल्याने दीर्घकालीन दिलासा मिळेल, असा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

COMMENTS