Pune Congress | पुण्यात “छात्रों की गुंज” अंतर्गत भव्य कॅन्डल मार्च | हजारो पुणेकर रस्त्यावर
Pune News – (The Karbhari News Service) – NEET पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही विद्यार्थ्यांवरील अमानुष कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने पुण्यात “छात्रों की गुंज” या मोहिमेअंतर्गत भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मोर्चाला हजारो पुणेकरांनी प्रतिसाद देत तिरंगा हात घेऊन सहभाग नोंदवला. (Pune Breaking News)
गेल्या 28 दिवसांपासून देशभरातील विद्यार्थी NEET पेपर फुटी विरोधात रस्त्यावर आहेत. या प्रकरणाच्या नैराश्यातून 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करत विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. मात्र या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार, टिअर गॅस आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला, तसेच काहींवर गुन्हेही दाखल झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

कॅन्डल मार्चनंतर प्रसिद्धीपत्रक देताना काँग्रेसचे पुणे पूर्व शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, धर्मेंद्र प्रधान हा प्रश्न छोटा आहे. खरा प्रश्न आहे तो मोदी सरकारचा अहंकार. विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पोलिस बळाने चिरडण्याचा प्रयत्न झाला. आंदोलकांना दहशतवादी संबोधण्यात आले. या अहंकाराविरोधात देशातील तरुणाईने आवाज उठवला आहे.
मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा राजकीय घोषणाबाजी नव्हती. केवळ विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तिरंगा घेऊन पुणेकर सहभागी झाले होते, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
या कॅन्डल मार्चद्वारे काँग्रेसने तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
1. विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष कारवाईबाबत मोदी सरकारने जाहीर माफी मागावी.
2. आंदोलक विद्यार्थ्यांवर नोंदवलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.
3. पेपर फुटीच्या नैराश्यातून आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य द्यावे.

या मोर्चात काँग्रेसचे पुणे पूर्व शहराध्यक्ष प्रशांत जगताप, गटनेते चंदूशेठ कदम, ज्येष्ठ नेते गोपालदादा तिवारी, रफिक शेख, साहिल केदारी, सुनील शिंदे, शिवा मंत्री, विशाल मलके, वैशाली भालेराव, अश्विनी लांडगे, दिपालीताई डोख, सौरव अमराळे, अभिजीत गोरे, पुष्कर आबनावे, अक्षय जैन, स्वातीताई शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “छात्रों की गुंज” या देशव्यापी मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांच्या लढ्याला बळ दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याने हा कॅन्डल मार्च पुण्यातील विद्यार्थी आंदोलनाचा एक निर्णायक टप्पा ठरला, असे आयोजकांनी सांगितले.

COMMENTS