Nandini Dhende | महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा ; प्रभागातील व वडगाव शेरीतील पाच लाख नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : नंदिनी धेंडे
– प्रभाग क्रमांक दोनसह वडगाव शेरी मतदारसंघामध्ये पाच दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा
– शुद्ध आणि सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास नागरिकांसह महापालिकेवर आंदोलन
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनसह वडगाव शेरी मतदारसंघात २० मे पासून गेल्या पाच दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भामा आसखेड प्रकल्पातून होणाऱ्या या पाणीपुरवठ्याला दुर्गंधी येत असून अनेक भागांमध्ये जुलाब, उलट्या आदी आजारांचे रुग्ण वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. या परिसरातील पाच लाख नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून साथीचे आजार पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रभाग दोन मधील नागपूर चाळ, महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, त्रिदलनगर, टिंगरेनगर, चव्हाण चाळ, कस्तुरबानगर, जेल रोड परिसरासह वडगाव शेरी मतदारसंघात ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. (Nandini Siddharth Dhende NCP)
या प्रकरणी नगरसेविका नंदिनी धेंडे आणि माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, यांच्यासह प्रभाग दोन व चार मधील नगरसेवकांच्या वतीने हे प्राशन समोर आणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार करून सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. नागरिकांकडून वाढत्या तक्रारी लक्षात घेता त्यांनी पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप, लष्कर झोन प्रमुख केळकर तसेच बंडगार्डन विभाग प्रमुख ऐकनाथ गाडेकर यांच्याशी संपर्क साधून परिसरातील परिस्थितीची माहिती दिली.
याबरोबरच भामा आसखेड जलशुद्धीकरण प्रकल्पाचे व्यवस्थापक तारु यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. यावेळी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने ही समस्या उद्भवली असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र नागरिकांना अशुद्ध पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नंदिनी धेंडे , सुहास टिंगरे, शितल सावंत, रवि टिंगरे आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारात पाणीपुरवठा विभाग आणि विद्युत विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही अधिकारी भामा आसखेड जलशुद्धीकरण प्रकल्पात तांत्रिक अडचण असल्याचे सांगत आहेत, तर काही अधिकाऱ्यांकडून कोणतीही समस्या नसल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिका प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची टीका धेंडे यांनी केली. दूषित पाणीपुरवठा तातडीने बंद करून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नंदिनी धेंडे आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी तसेच प्रभाग दोनचे चारही नगरसेवकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईलअसा इशारा महापलिका प्रशासनाला दिला आहे.
—————————

COMMENTS