Dr Siddharth Dhende | दुकानदारांकडून धान्य विक्रीतील काळा बाजार न थांबल्यास उपोषण करू  | पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा

HomeपुणेBreaking News

Dr Siddharth Dhende | दुकानदारांकडून धान्य विक्रीतील काळा बाजार न थांबल्यास उपोषण करू | पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा

कारभारी वृत्तसेवा Nov 28, 2023 11:52 AM

Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मधील अवैध धंद्यांना बसणार चाप
PMC Ward no 2 | पावसाळी समस्येतून प्रभाग दोन मधील नागरिकांची होणार सुटका | तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Bhide Wada Smarak High Court | उच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सावित्रीबाई फुलेंना मानवंदना : डॉ. सिद्धार्थ धेंडे

Dr Siddharth Dhende | दुकानदारांकडून धान्य विक्रीतील काळा बाजार न थांबल्यास उपोषण करू

| पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा इशारा

| मुख्य अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना निवेदन

Dr Siddharth Dhende | स्वस्त धान्य दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारकांना धान्याचे पुरेसे वाटप करावे. धान्य वाटपातील काळा बाजार थांबवावा. अन्यथा अन्न धान्य वितरण व पुरवठा कार्यालयाच्या पुणे कार्यालयासमोर नागरिकांसह तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडू असा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिला. तसेच दुकानदारांना चुकीच्या कामात अभय देणाऱ्या शिधापत्रिका कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी मुख्य अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना निवेदनात केली.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, पुणे शहरातील शिधा वाटप केंद्रामार्फत धान्याचे पुरेसे वाटप केले जात नाही. नागरिकांकडून सातत्याने अशा तक्रारी येत आहेत. शिधापत्रिका कार्यालयाच्या येरवड्यातील ई विभाग अंतर्गत नागपूर चाळ आणि हाऊसिंग बोर्ड या ठिकाणी चार स्वस्त धान्य वितरणाचे दुकान आहे. या दुकानांपैकी सर्व दुकानांमधून शासन मार्फत प्रति युनिट येणारे धान्य नागरिकांपर्यंत पोहचत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तसेच आपल्या संबंधीत अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे चालू असल्याचे लक्षात येत आहे. या संबंधीत अधिकारी व दुकानदाराची चौकशी करून अन्नधान्याचा काळाबाजार व भ्रष्टाचार होत असेल तर त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच स्वस्त धान्य दुकानाला शासनामार्फत होणारा पुरवठा व दुकानदाराकडून होणारे वितरण यांची माहिती दर्शनीय भागात लावावी. नागरिकांना धान्य वितरीत केल्यानंतर पावती मिळत नाही. जर एका घरात पाच व्यक्ती असतील तर त्यांना दोनच व्यक्तीचे धान्य दिले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. इतर व्यक्तीचे धान्य काळ्या बाजाराने विकले जात आहे. तरी यावर लवकरात लवकर कार्यवाही करून सर्व नागरिकांना माहिती मिळावी. तसेच नागरिकांना पुरेसे धान्य देण्यात यावे.

अन्यथा कार्यालयासमोर गरिबांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन व उपोषण करू, असा इशारा डॉ. धेंडे यांनी निवेदनाद्वारे दिला.
———————————–