Mayor on Palkhi Sohala | होळकर पुल परिसरातील ५ तासांचा कालावधी कमी करण्याबाबत उपाययोजना करा | महापौरांचे प्रशासनाला निर्देश
Pune News – (The Karbhari News Service) – संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी आगमनाच्या वेळी होणारी गर्दी लक्षात घेता, होळकर पुल परिसरातील ५ तासांचा कालावधी कमी करण्याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आगामी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यवस्थापन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष नियोजन करावे, अशा सूचना महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. (Pune PMC News)
पालखी मार्गावरील संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे, स्वागत मंडळाकडून स्पीकर व पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करणे, तसेच ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत, आगमन व प्रस्थान मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी.
मुख्य ठिकाणी जलपान, वैद्यकीय तपासणी व आवश्यक सेवा केंद्रे उभारण्यात यावीत. तसेच, माणूसबळ, शाळा व प्रशासकीय यंत्रणा यांचा योग्य समन्वय साधून कार्यवाही करण्यात यावी. भाविकांच्या सोयीसाठी PMPML बससेवा योग्य ठिकाणी उपलब्ध करून देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
बोपोडी परिसरात पालखी जाताना तीव्र चढ-उतार असल्याने तेथे ‘हाइट बॅरिअर’ उभारण्याची सूचना करण्यात आली असून, संबंधित काम PWD मार्फत तातडीने पूर्ण करावे. उत्सव काळात प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे नियोजन काटेकोरपणे अंमलात आणण्यात यावे.
तसेच, पालखी सोहळा प्रमुख मार्गांवर सर्व सोयीसुविधा पूर्ण केल्यानंतर त्याचे संपूर्ण नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधावा. आवश्यक असल्यास ‘रेनकोट’ व इतर साहित्याचीही उपलब्धता सुनिश्चित करावी.
बोपोडी व खडकी परिसरात पालखी विश्रांती वेळ सुमारे १५ मिनिटे निश्चित करण्यात येणार असून, भाविकांना दर्शन घेण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात येणार आहे.
प्रशासनाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय ठेवून पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS