हा विजय रविंद्र धंगेकरांचा! महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये
पुणेः भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत. साधारण १० हजार ८०० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.
स्थानिक उमेदवार आणि स्थानिक मुद्दे घेऊन कसब्याची निवडणूक झाली. शिवाय रवींद्र धंगेकर यांचं ग्राऊंड लेव्हलवरील काम, त्यांचा साधेपणा; हे मुद्दे काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कामी आले आहेत. काँग्रेसला धंगेकरांच्या माध्यमातून विजयाचा सूर गवसू शकतो.
दरम्यान या विजयामुळे आपण येत्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीत विजय हासील करू शकतो. असे स्वप्नरंजन महाविकास आघाडीचे नेते पाहताहेत. पण असं होण्याची शक्यता कमी आहे. कारण भाजपवर जर लोक नाराज असते तर चिंचवड मध्ये देखील भाजपचा पराभव झाला असता. मात्र असे झाले नाही. कसबा जरी भाजपचा बालेकिल्ला असला तरी मुक्ता टिळक यांच्या घरातील उमेदवार न दिल्याने लोक पहिलेच नाराज होते. शिवाय व्यक्ती म्हणून रविंद्र धंगेकर त्या परिसरात खूप लोकप्रिय आहेत. यामुळे ही जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. भाजपने आखलेली रणनीती पाहता धंगेकर यांच्या जागेवर दुसरा उमेदवार असता तर तो टिकू शकला नसता. त्यामुळे भाजपची लोकप्रियता कमी झाली आहे. असे मानण्याचे कारण नाही. मात्र महाविकास आघाडीला आणि भाजपला कळून चुकले असेल कि निवडणूक जिंकायची असेल तर रविंद्र धंगेकर यांच्यासारखे उमेदवार तयार करावे लागतील.