Marathi Bhasha Ani Sanskriti |विशेष लेख – मराठी भाषा आणि संस्कृती यावर अतिक्रमण होते आहे का! – विकास मोहन साळुंके
Maharashtra Day 2025 – (The Karbhari News Service) – आपली सर्वांची मातृभाषा असणारी मराठी भाषा ही मागील कित्येक वर्षापासून आहे तशी आहे आणि ती इतकी गोड आहे की ज्ञानेश्वर महाराज तिचे कौतुक करताना असे म्हणाले आहेत की ,
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
अशी ही आपली मराठी भाषा आहे आणि आपली भाषा ही आपली संस्कृती दर्शवत आहे आणि आपली संस्कृती याचे द्योतक हीच भाषा आहे म्हणून तर सुरेश भट म्हणतात की,
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी |
एवढ्या जगात माय मानतो मराठी |
असेच आपले भाग्य आहे की आपण मराठी भाषिक आहोत आणि मराठी भाषेला ही आता नुकताच अभिजात भाषा म्हणून देखील आता केंद्रीय स्तरावर त्याला दर्जा प्राप्त झाला आहे. दर्जा प्राप्त झाला नसता तरी ती किती अभिजात आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही; पण काही गोष्टी या ठरवण्यासाठी जग मान्यता मिळणे गरजेचे असते.
मराठी भाषा जशी अभिजात आहे, तशीच आपली संस्कृती ही देखील अशीच आहे. अगदी बावनकशी सुहोण्या सारखी उगाचच नाही ती सातासमुद्रा पार असणाऱ्या लोकांना देखील आपल्या संस्कृतीचे कुतूहल आणि त्याचे कौतुक देखील आहे. त्या कौतुकामुळेच अनेक पश्चिमात्य देशांतील लोकांनी त्याचे अनुकरण करत आहेत. या मध्ये आपल्या संस्कृती दर्शवणार अनेक सण वार आहेत. जे आपल्या संस्कृती चे वेगळे पण दर्शवतात आणि त्यामधील विविधता असली तरी त्या विविधते मध्ये एकता आणि समाज एक संध ठेवण्याची एक मोठ्या ताकदीची प्रचिती आपणास येते. अशी ही आपली संस्कृती आपल्याला अभिमानास्पद गौरवशाली वाटत आहे.
मराठी भाषा किती चांगली आहे हे जरी माहित असले तरी त्यावर आजचा काळात इतर हिंदी आणि इंग्लिश भाषेचे अतिक्रमण झालेले आपल्याला पहायला मिळत आहे. आणि हे का होत आहे याचे प्रमुख कारण हे आपल्यामधेच दडलेले आहे. तुमचा माझा घरात आता शिक्षण हे मातृभाषे ऐवजी इंग्रजी माध्यमातून देण्यावर आपण भर देत आहे. म्हणून आपल्या भाषेवर अतिक्रमण होत आहे. हे एवढे झपाट्याने होत आहे की आपल्या घरात आईची मम्मी आणि वडील बाबा ,तात्या आबा पासून ते पप्पा पर्यंतचा प्रवास कधी झाला ते आपल्याला कळलेच नाही. तसेच दिवाळी सारख्या सणामध्ये दिवे लावून सगळीकडे प्रकाश मान करणारी आपली संस्कृती विसरून जात आहोत. आता वाढदिसाला देखील औक्षण करायचे सोडून आपण मेणबत्ती विजवून केक कापण्यात धन्यता मानत आहे. तसेच आपल्या मुलांना वासुदेव आला रे वासुदेव आला या पेक्षा सांताकलोज याचे आकर्षण वाटायला लागले आहे. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत यावरून हे मराठी भाषा आणि संस्कृती वर अतिक्रमण होताना आपल्या दिसत आहे आणि डोळसपणे दिसून सुद्धा आपण या गोष्टी स्वीकारून पुढे जाताना दिसत आहे.
या सर्व गोष्टी होत असताना आता या मध्ये आमूलाग्र बदल होत आहे. समाजामध्ये अनेक सामाजिक संस्था किंवा राजकीय पक्ष मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेत आहेत आणि त्यामुळे अनेक अडचणी मध्ये देखील आज मराठी माध्यमांच्या शाळा चालू दिसत आहेत. यामध्ये अनेक शिक्षणतज्ज्ञ यांनी देखील असे सांगतात की मातृभाषेमध्ये प्राथमिक शिक्षण होणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक संकल्पना जास्त चांगल्या पद्धतीने समजत असतात आणि हे अनेक पालकांना पटत आहेत. म्हणून अनेक मुले प्रामुख्याने ग्रामीण आणि निमशहरी भागात मराठी माध्यम शाळेत शिकत आहेत हे आपल्याला पहायला मिळत आहे.
आज आपण कितीही इतर भाषांचे गोडवे गायले तरी शेवटी आपल्याला आपल्या पायावर उभा राहण्यासाठी किंबहुना इंग्रजी माध्यमांच्या शाळेच्या फी भरण्यासाठी लायक या मराठी भाषेने संस्कृती यांनीच केलेले आहे. आपण ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो आहे त्यांनीच आपल्याला लायक केले आहे आणि आपण त्याची जाणीव नाही ठेवली तर आपण लायक नाही तर नालायक ठरू
बस एवढंच काय ते…
– विकास मोहन साळुंके, गाळणी परिचर, होळकर जलकेंद्र, पुणे महानगरपालिका
(विशेष टीप – या लेखातील मते ही संबंधित लेखकाची वैयक्तिक मते आहेत. याच्याशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)
COMMENTS