Maharashtra Din | महाराष्ट्र दिन विशेष लेख | स्वप्नातील महाराष्ट्र – एक विचारप्रवास – सिद्धार्थ मेश्राम
Maharashtra Divas – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र – ही केवळ एक भौगोलिक संज्ञा नाही, तर ती विचारांची, संस्कृतीची आणि चळवळींची ओळख आहे. पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख आपण शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांमुळे मिळवली. पण आजच्या घडीला, काही प्रमाणात हे राजकारण आणि समाजकारण बिघडलेलं जाणवतं. (Maharashtra Day)
राजकारणात आदर्शवादाऐवजी स्वार्थवाद, समाजकारणात सलोख्याऐवजी विघटनाचं चित्र दिसतं. जातीयता, द्वेष, आणि गोंधळ यांचं प्रमाण वाढताना दिसतं.
अर्थकारणाच्या दृष्टीनेही, वाढती बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि वाढती महागाई ही चिंतेची कारणं आहेत. केवळ मोठ्या उद्योगांवर भर न देता, शेती, लघुउद्योग, पर्यटन, आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यावर भर असायला हवा.
मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर, अतिक्रमण नक्कीच होतं आहे. इंग्रजीचं वाढतं वर्चस्व, शहरी भागात मराठी भाषेची उपेक्षा, यामुळे अस्वस्थता वाटते. पण दुसरीकडे तरुणाईत लोककला, सर्जनशील लेखन आणि मराठी वेब सिरीजमुळे एक नवचैतन्य देखील दिसतं आहे.
जर हे सर्व प्रश्न नकारात्मक दिशेने जात असतील, तर मग माझा स्वप्नातील महाराष्ट्र असा असावा—
• जिथे प्रत्येक माणूस शिक्षित, सुसंस्कृत आणि संवेदनशील असेल,
• जिथे राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर सेवा असेल,
• जिथे शेती आदराने पाहिली जाईल, आणि शेतकऱ्यांना आत्महत्येऐवजी आत्मविश्वास दिला जाईल,
• जिथे मराठी भाषा आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळून पुढे जाईल,
• आणि जिथे प्रत्येकजण माणुसकीच्या धर्माने जोडलेला असेल.
म्हणूनच, आपल्या हातात लेखणी आहे – ती केवळ परीक्षा लिहिण्यासाठी नव्हे, तर भविष्यातला महाराष्ट्र घडवण्यासाठी वापरणं गरजेचं आहे.
– सिद्धार्थ मेश्राम (लिपिक टंकलेखक), प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे महानगरपालिका
————
(विशेष टीप – या लेखातील मते ही संबंधित लेखकाची वैयक्तिक मते आहेत. याच्याशी संपादक सहमत असतीलच असे नाही)
COMMENTS