Hinjewadi Shivajinagar Metro | हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कोणासाठी थांबविली? | मुख्यमंत्र्यांच्या निव्वळ घोषणाच | माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल
Mohan Joshi Pune Congress – (The Karbhari News Service) – हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली असतानाही मेट्रो मार्गावर अजून धावू लागलेली नाही, ती कोणासाठी थांबविली आहे? असा सवाल माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महामेट्रोला केला आहे. (Pune News)
मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा टप्पा जुलै महिन्यात सुरू होईल, अशी घोषणा मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली होती. प्रत्यक्षात त्या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही. १५ जुलैला पहिला टप्पा तरी सुरू होईल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. तेही नियोजन कोलमडले आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यासाठी पुणे विमानतळावरील टर्मिनल विलंबाने कार्यान्वीत केले. त्याच प्रमाणे भाजपला मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी आणि गाजावाजा करण्यासाठी हिंजवडी-शिवजीनगर मेट्रो सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहिला जात आहे का? अशी विचारणा मोहन जोशी यांनी केली आहे .
हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो मार्च २०२५ मध्ये धावू लागेल असे कामाचे मूळ वेळापत्रक होते. त्यानंतर सव्वा वर्ष उलटून गेले तरी मेट्रोची प्रतिक्षाच करावी लागत आहे. मार्च नंतर सप्टेंबर २०२५, डिसेंबर २०२५, मार्च २०२६, मे २०२६, १५ जून २०२६, १५ जुलै २०२६ अशा वेगवेगळ्या तारखा उदघाटनासाठी म्हणून जाहीर झाल्या. या निव्वळ घोषणाच ठरल्या. भाजप सरकारच्या पोकळ घोषणाबाजीचा आणि ढिसाळ कारभाराचा हा नमुना आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

COMMENTS