Pune Water Cut | पुण्यात १५ जुलै पासून पुन्हा पाणीकपात!
अल निनोचे संकट कायम | धरणे १०० टक्के भरेपर्यंत कपात सुरूच राहणार : आयुक्त नवल किशोर राम
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – पुणेकरांना पुन्हा एकदा पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. १५ जुलै पासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. याबतची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. (Pune Water Supply)
गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये सध्या एकूण १७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे तात्पुरती पाणीकपात स्थगित करण्यात आली होती.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जूनच्या मध्यापर्यंत केवळ ४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे १५ जून पासून शहरात एक दिवस आड पाणीकपात लागू करण्यात आली होती.
दरम्यान गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्याचबरोबर शहरात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांना गैरसोय होऊ नये म्हणून पाणीकपात तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.
पावसामुळे पाणीसाठा वाढला असला तरी अल निनोचे संकट अजूनही कायम आहे, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खबरदारी म्हणून पाणीकपात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयुक्तांनी सांगितले की, खडकवासला धरण साखळीतील धरणे १०० टक्के भरतील तोपर्यंत पाणीकपात सुरूच राहणार आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास आणि धरणे लवकर भरल्यास पाणीकपातीच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS