Pune Water Supply News | पुण्यातील पाणीटंचाई मनुष्यनिर्मित | कालवा समितीच्या बैठकींचे वृत्तांत जाहीर करण्याची मागणी
Pune Water Cut News – (The Karbhari News Service) – पुण्यात दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाई ही नैसर्गिक नसून ती पूर्णपणे मनुष्यनिर्मित आहे, असा थेट आरोप करत माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी कालवा समितीच्या सर्व बैठकींचे वृत्तांत जाहीर करण्याची मागणी केली आहे. (Pune Breaking News)
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “पुणे शहरासाठी किती पाणी देण्याचे ठरले होते आणि प्रत्यक्षात किती दिले गेले, याची जाहीर तपासणी होणे आवश्यक आहे.”
नेत्यांनी आरोप केला की, ज्या तालुक्यांमध्ये आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये उसाची शेती मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे पाणीवाटपात प्राधान्य दिले जाते. तर दुसरीकडे प्रामाणिक कर भरणाऱ्या पुणेकर नागरिकांना मात्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
“पाणी वाटपाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे माणसाला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे. परंतु आज नेमके उलटे होत आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
सध्या पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पाण्याची बचत होण्याऐवजी उलट जास्त पाणी वाया जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
“ज्या दिवशी पाणी बंद असते, त्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी प्रेशरने येईल की नाही, याची भीती पुणेकरांच्या मनात असते. त्यामुळे नागरिक पाणी साठवून ठेवतात. हा पाणी बचतीचा मार्ग नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
नेत्यांनी मागणी केली की, कालवा समितीच्या बैठकीत काय ठरले, त्याची अंमलबजावणी झाली का, हे पुणेकरांना कळले पाहिजे.
“पुण्यातील सर्व आमदारांनी एकजुटीने विचारले पाहिजे की ठरले काय आणि झाले काय? पुणेकर मतदार नाहीत का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
पाणी वाटपातील पारदर्शकता आणि प्राधान्यक्रम स्पष्ट करण्यासाठी कालवा समितीच्या सर्व बैठकींचे वृत्तांत तातडीने जाहीर करावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

COMMENTS