Youth Congress on Union Budget | सामान्य, युवा आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच — घोषणाबाजीचा पण दिशाहीन अर्थसंकल्प | युवक कॉंग्रेसची टीका
Union Budget – (The Karbhari News Service) – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ कडून देशाला रोजगार, शिक्षण आणि आर्थिक दिलास्याच्या मोठ्या अपेक्षा होत्या; मात्र सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ घोषणांचा गाजावाजा ठरला आहे. प्रत्यक्षात सामान्य नागरिक, तरुण, शेतकरी आणि वंचित घटकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस आर्थिक तरतूद किंवा स्पष्ट धोरण दिसत नाही. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी केली आहे. (Marathi News)
शैक्षणिक क्षेत्रात गुंतवणुकीऐवजी खर्चकपातीचा कल जाणवतो. सरकारी शाळा, महाविद्यालये, शिक्षक भरती, संशोधन व कौशल्य विकासासाठी आवश्यक निधी वाढवला गेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक दुर्लक्षित राहिली आहे.
रोजगाराच्या बाबतीतही चित्र निराशाजनक आहे. उद्योग, उत्पादन आणि MSME क्षेत्राला चालना देणाऱ्या ठोस योजना नसल्याने लाखो तरुणांच्या नोकरीच्या आशा अधांतरीच राहिल्या आहेत. “डिग्री आहे, पण संधी नाही” अशी स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
शेतकरी व ग्रामीण भागासाठी खत, बियाणे, हमीभाव किंवा थेट मदतीसंदर्भात कोणतीही ठोस घोषणा नाही. कृषी क्षेत्राचा विकासदर घसरत असताना सरकारकडून अपेक्षित असलेले ठोस हस्तक्षेप या बजेटमध्ये दिसले नाहीत.
यासोबतच एससी, एसटी आणि ओबीसी समाजासाठी असलेल्या केंद्रीय निधीत मोठ्या प्रमाणात कपात किंवा निधी अन्यत्र वळविण्यात आल्याचे चित्र दिसते. सामाजिक न्याय आणि समावेशक विकासाचा दावा करताना वंचित घटकांच्या योजनांनाच मर्यादा आणणे हे गंभीर आणि चिंताजनक आहे.
पुणे आणि महाराष्ट्रासारख्या औद्योगिक व शैक्षणिक केंद्रासाठीही कोणतीही विशेष तरतूद नसल्याने राज्याच्या विकासाला दुय्यम स्थान दिल्याची भावना निर्माण झाली आहे.
त्यातच शेअर बाजारात STP/भांडवली व्यवहार कर वाढवल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मकता वाढली असून गुंतवणूक घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
एकंदरीत, हा अर्थसंकल्प देशाच्या वास्तव समस्यांवर उपाय न देता केवळ आश्वासनांपुरताच मर्यादित राहिला आहे. जनतेला दिशा हवी होती, पण मिळाली निराशा. असे आबनावे यांनी म्हटले आहे.

COMMENTS