Wakad – Balewadi Bridge | वाकड बालेवाडी पूल जनतेकरीता खुला करण्याची प्रक्रिया जलद करण्याचे पुणे महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
Pune Municipal Corporation – (The Karbhri News Service) – वाकड बालेवाडी पूल बांधकाम होऊन १० वर्षे झाल्यानंतरही सार्वजनिक वापरासाठी बंदच असल्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी अंतिम सुनावणी दिनांक ०९/०४/२०२५ रोजी झाली आणि दिनांक १५/०४/२०२५ रोजी मुख्य न्यायाधीश श्री. आलोक आराधे आणि न्यायमूर्ती श्री. एम. एस. कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिलेला आदेश अपलोड करण्यात आला. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेत उपस्थित केलेल्या रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेतली आणि भूसंपादन आणि पूल उघडण्यासाठी तात्काळ आणि जलद कार्यवाही करण्याचे पुणे महानगरपालिका आणि इतर प्रतिवादींना आदेश दिले.
सदरच्या जनहित याचिकेत याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे अॅड. सत्त्या मुळे यांनी असा युक्तिवाद केला की, पुण्यातील बाणेर आणि बालेवाडी हे परिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वाकड, कस्पटे वस्ती इत्यादी परिसरांपासून मुळा नदीमुळे वेगळे राहिलेले आहेत. गेल्या २ दशकांपासून दोन्ही परिसरातील लोकसंख्या, बांधकाम आणि व्यावसायिक विकास यामध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. बरेच लोक वाकडमध्ये राहतात आणि बाणेर, बालेवाडी आणि येथे काम करतात आणि याउलट बाणेर-बालेवाडी येथे राहणारे लोक वाकडमध्ये कामास जातात. आणि सद्यपरिस्थितीत त्यांना केवळ मुंबई-बंगळुरू महामार्गावरून जाणाऱ्या ‘खूप लांब आणि दूरच्या मार्गावर ‘ अवलंबून रहावे लागत आहे. बालेवाडी, बाणेर आणि वाकड यांना जोडणारा मुळा नदीवरील पूल सन २०१३ मध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी संयुक्तपणे मंजूर केला होता.
ॲड. सत्त्या मुळे यांनी असा युक्तिवाद केला की, या भागातील रहिवाशांसाठी दररोज वाहतूक वाढत असल्याने परिस्थिती बिकट होत आहे. रस्त्यांवर मोठे अडथळे आहेत आणि सदर पूल वाहतुकीस चालू केल्याने या भागातील अनेक ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि मौल्यवान इंधन आणि वेळ वाचेल.
बालेवाडी, बाणेर आणि वाकड या भागात वेगाने शहरीकरण झाले असले तरी, दाट लोकवस्ती असलेल्या प्रदेशातील रहिवाशांना पर्यायी अव्यवहार्य २ पर्यायांवर अवलंबून राहावे लागत आहे. एक पर्याय म्हणजे जास्त वापरला जाणारा मुंबई बंगळुरू महामार्ग. बालेवाडी आणि बाणेरच्या बाजूने सदर महामार्गावर जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. राधा चौकात, जिथे बहुतेक वेळा गर्दी असते आणि लोकांना ५ ते ६ किलोमीटरपेक्षा जास्त अंतर प्रवास करावा लागतो. आणि वाहतूक कोंडीमुळे, अनेक वेळा ४० मिनिट ते १ तासापेक्षा जास्त वेळ प्रवासामध्येच जातो, ज्यामुळे प्रभावित लोकांचे मौल्यवान इंधन आणि वेळ वाया जातो. वाकडमध्ये रहिवासी असणारी लोकसंख्या खूप मोठी असून ते बालेवाडी, बाणेर भागात काम करतात आणि याउलट बालेवाडी भागात राहणारे लोक वाकड भागात कामास आहेत. लोकांना उपलब्ध असलेला दुसरा पर्याय म्हणजे विशाल नगरपासून बराच लांब असलेला पूर्वेकडील पूर्णपणे वेगळा परिसर होय.
COMMENTS