Book Publication | श्रावणधारा काव्य महोत्सवात रंगला पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा | कविता म्हणजे आत्मस्वर व सत्याचा शोध :प्रा.डॉ.वसंत गावडे
Book Publication – (The Karbhari News Service) : शिवजन्मभूमी, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक तिर्थक्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या ओतूर येथे दुसरा राज्यस्तरीय *श्रावणधारा* काव्यमहोत्सव, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे आयोजित करण्यात आला होता. नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे, संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य, ओतूर, पुणे,आणि वर्ल्ड व्हिजन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रावणधारा काव्यसंमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी राजेश साबळे- ओतूरकर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे आणि राजकवी डॉ. खं. र. माळवे उपस्थित होते. महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंत गावडे आणि ओतूरच्या सरपंच प्रा. डॉ.छायाताई तांबे यांची प्रमुख उपस्थिती प्रार्थनीय ठरली. ओतूर गावचे लोकप्रिय साहित्यिक डॉ. प्रविण डुंबरे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. युवराज्ञी सोनवणे व वाघिरे कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. महाराष्ट्र गीताने संमेलनाची सुरुवात झाली. प्रास्ताविकातून डॉ. प्रविण डुंबरे यांनी कार्यक्रम आयोजनाची भूमिका व रूपरेषा स्पष्ट केली. सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य मा. मोहित ढमाले यांनी स्पर्धकांसाठी सन्मान चिन्हांचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे मनोगतात म्हणाले “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व स्तरातील लोकांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत.” . प्रा.डॉ. वसंत गावडे म्हणाले,”कवितेतून हजार शब्दांचा आशय एका ओळीतून व्यक्त होतो. कवीचा आत्मस्वर व सत्याचा शोध म्हणजे कविता असते. भावी पिढीसाठी कवींनी दर्जेदार कविता लिहावी. सर्जनशीलतेचे विविध पैलू कवितेत असतात. भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे कविता असते.” सरपंच डॉ. छाया तांबे संमेलनाला शुभेच्छा देताना म्हणाल्या,” कवितांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. काव्याचा फार मोठा वारसा आपल्या संस्कृतीला लाभला आहे.”
त्यानंतर श्री. राजेश साबळे यांचे *सणोत्सव*, डॉ. प्रविण डुंबरे यांची अनुक्रमे *प्रतिबिंब* आणि *रिमझिमधारा,* डॉ. रोहिणी मदने यांचे *हुंकार वेदनेचा* आणि माजी मुख्याध्यापक दावल ठिकेकर सर यांचे *हिंदी अभिनेते आणि अभिनेत्री* अशी एकूण पाच पुस्तके प्रकाशित करण्यात आली .
*श्रावणधारा* काव्यस्पर्धेत सुमारे ७५ कवींनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून जेष्ठ साहित्यिक सुरेश डुंबरे,संजय गवांदे व सरिता कलढोणे यांनी काम पाहिले. परिक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. काव्य स्पर्धेचे विजेते अनुक्रमे प्रथम मनोज कुमार सरदार -आंबेगाव, द्वितीय गौतम वाघमारे -संगमनेर, तृतीय प्रदीप बडदे -नवी मुंबई, चतुर्थ कल्पना देशमुख -नवी मुंबई, पाचवा लीना बाबर साबळे -अंबरनाथ व छाया डुंबरे-ओतूर तसेच उत्तेजनार्थ रामचंद्र भडवडकर- रत्नागिरी व डॉ. राम राऊत -उंब्रज यांना घोषित करण्यात आले.
संत गाडगे महाराज विचारमंचच्या वतीने सूर्यकांत शेटकार, अरुण माने, देविदास इंगळे, अर्जुन कांबळे आणि हिराबाई औटी या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राजेश साबळे यांनी अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषेला लागलेली उतरती कळा आणि उपाययोजना यावर आपले विचार मांडले. विजयी व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांमध्ये स्तंभलेखक संजय नलावडे, बॉर्डरलेस पँथर्स परिवाराचे संस्थापक दिपक भाऊ सुकाळे, जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नायकोडी, शांता शेळके प्रतिष्ठान मंचरचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे, म.सा. परिषद राजगुरुनगर शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे, वाघिरे कॉलेजचे मा. प्राचार्य डॉ. नामदेव डोके, डॉ. डी. बी.मते, प्रशांत गायकवाड, राजेंद्र सगर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.नागेश हुलवळे आणि रणजित पवार यांनी केले. रणजित पवार यांनी आभार प्रदर्शन केले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
COMMENTS