Pune News | श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करत “ऑपरेशन सिंदूर”चा आनंदोत्सव पुणेकरांकडून साजरा
IND PAK War – (The karbhari News Service) – जम्मू काश्मीरचा पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २७ भारतीय नागरिकांचा बळी गेला. ज्यांचे कुंकू पुसले गेले त्या लेकींच्या अश्रूंना उत्तर देण्यासाठी भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या शौर्यगाथेचा विजयोत्सव आज पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर “भारत माता की जय!”, “वंदे मातरम!” च्या घोषणांनी दणाणून गेला होता.
यावेळी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्यात भारताच्या २७ निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून भारतात परतले आणि थेट जम्मू काश्मीरला गेले. त्यांनी तेव्हाच इशारा दिला होता की या हल्ल्याचे सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. आज भारतीय सैन्याने ते सिद्ध करत पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.”
“आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगात शांततेचा संदेश पसरतो आहे. मात्र भारतावर कोणताही भ्याड हल्ला झाला, तर त्याला सडेतोड उत्तर देण्याची ताकद भारताकडे आहे हे भारतीय सैन्याने दाखवून दिले आहे. आमच्या नादाला लागणाऱ्याला गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा स्पष्ट संदेश पाकिस्तानला आजच्या कारवाईतून मिळाला आहे. पहलगाम हल्ल्यातील मृत २७ नागरिकांना ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे,” असेही आमदार रासने यांनी नमूद केले.
महाआरतीसाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट अध्यक्ष सुनील रासने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अमित कंक, छगन बुलाखे, प्रशांत सुर्वे यांच्या माध्यमातून या आनंदोत्सवाचे संयोजन करण्यात आले.
——–
‘ऑपरेशन सिंदूर’ अभिमानास्पद -नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
जम्मू काश्मीरचा पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत आज केलेली कारवाई प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्यात ज्या अभागी महिलांना आपल्या पतीला गमवावे लागले, त्याचा बदला भारतीय जवानांनी’ऑपरेशन सिंदूर’द्वारे सडेतोड प्रत्युत्तर देत घेतला. चिमूटभर सिंदूरची किंमत काय असते याची जाणीव भ्याड पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना झाली असेल. देशभरातील प्रत्येक महिला भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि लष्कराच्या तिन्ही दलांचे मी अभिनंदन करते.
———
‘ऑपरेशन सिंदूर’ : नव्या भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक – मुरलीधर मोहोळ
‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारतीय सैन्याची अत्यंत धाडसी, यशस्वी आणि ऐतिहासिक कारवाई आहे! दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देताना सैन्याने देशाचा अभिमान आणखी वाढवला. या स्ट्राईकला ‘सिंदूर’ हे नाव देऊन आपल्या संस्कृतीचा सन्मान तर केला गेलाच, शिवाय पीडितांना न्यायही मिळवून दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना प्रत्युत्तर देण्यासाठी दिलेली मोकळीक सैन्यदलाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्त्वाचा धागा ठरली. नवा भारत असे भ्याड हल्ले सहन करणार नाही आणि चोख उत्तर दिल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही, हे मोदी सरकारने अधोरेखित केले आहे.
स्वागतार्ह बाब म्हणजे केवळ पहलगामच नाही, तर आधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही बदला घेतला गेला असून ही कारवाई नव्या भारताच्या सामरिक ताकदीची आणि आत्मविश्वासाची साक्ष देणारी आहे.
——–
ना भुलेंगे, ना भूलने देंगे!- चंद्रकांतदादा पाटील
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सुरक्षा दलानी पुरेपूर बदला घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तब्बल ९ तळ क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्धवस्त करण्यात आले. यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या संघटनाच्या तळांचा समावेश आहे. जिवाची बाजी लावून भारतीय सुरक्षा दलानी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. भारतीय सुरक्षा दलांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या संदर्भात मोदी सरकारच्या प्रत्येक कृतीच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. जगातील महत्वाच्या देशांशी संवाद साधून आणि भारताची न्याय्य बाजू पटवून देत, अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आला. भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन!
——–
COMMENTS