Pune Municipal Corporation | मार्च महिन्यात पुणे महापालिकेचे (PMC) 61 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त!
PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – मार्च, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 61 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून श्याम भुर्के, जेष्ठ मराठी भाषा प्रसारक, डॉ.शिल्पा प्रतिनिधी, अधिष्ठाता, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, श्रीनाथ भिमाले, माजी सभागृह नेते, निलेश निकम, माजी सभागृह नेते उपस्थित होते. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले.
सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्रीपाद पोफळ, सुधाकर साळुंके व जयंत ढेलवान यांनी पुणे महानगरपालिकेत केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुणे महानगरपालिकेचे आभार मानले.
तदनंतर निलेश निकम यांनी तुम्ही शहरासाठी गेली 20 ते 35 वर्षे चांगले काम केले आहे. तुमच्या मुळे शहर चांगले मोठे झाले आहे असे नमूद करून सर्व सेवानिवृत्त सेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीनाथ भिमाले यांनी पुणे महानगरपालिकेत आपण चांगले काम केले आहे. त्यामुळे पुणे शहराचा विकास झाला आहे. कामगार कल्याण विभागाकडून हा स्तुत्य उपक्रम खूप छान आहे तो असाच चालू ठेवला पाहिजे. आपण शहराच्या विकासाची जशी काळजी घेतली तशी आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी असे नमूद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्या डॉ. शिल्पा प्रतिनिधी यांनी सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, आपले छंद जोपासावेत, संतुलित आहार घ्यावा, चांगला आहार घेतला की आपण आजारपनापासून दूर राहतो असे नमूद करून सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्याम भुर्के यांनी सेवानिवृत्त सेवकांना संबोधित करताना आपण नेहमी आनंदित राहिले पाहिजे. घरामध्ये कधीही भांडणे करू नयेत. जरी भांडणे झाली तरी ती लगेच मिटली पाहिजेत, असे नमूद करून त्यांनी पती-पत्नी यांच्यातील भांडणे ही वाळूवरच्या रेघेप्रमाणे असावीत जेणेकरून पाण्याची लाट आल्यानंतर ती रेघ ज्याप्रमाणे काही मिनिटात संपून जाते तसे पती-पत्नीचे भांडण लगेच मिटले पाहिजे. मुलांबरोबर जी भांडणे होतात ती पाण्यावरील रेघे प्रमाणे मिटली पाहिजेत, म्हणजेच पाण्यावर काठीने मारले असता पाणी दोन भागांमध्ये दुभंगले जाते व पुन्हा क्षणार्धामध्ये एक होऊन जाते असे असावे. भांडणे ही कधीही काळ्या दगडावरच्या रेषेप्रमाणे कायमची नसावीत. सर्वांनी आनंदी राहा, आनंदाने जगा म्हणजे तुम्ही शंभरीपर्यंत जगू शकता असे नमूद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्या त आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विशाल कदम यांनी केले.
COMMENTS