Public Awareness in Palakhi Sohala | पालखी सोहळ्यात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती मोहीम राबविणार | स्थायी समितीची मान्यता
PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी स्थायी समितीकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात करण्यात आली होती. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhimale PMC) यांनी सांगितले.
नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar NCP) यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. पुणे हे राज्याची सांस्कृतिक राजधानी असून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित शहर आहे.
भारतीय राज्यघटनेच्या कलम ५१ (अ) (ह) नुसार वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सक वृत्ती विकसित करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य मानण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पुणे महापालिकेने अशा जनहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे
प्रस्तावात नमूद करण्यात आले.
दरवर्षी पालखी सोहळ्यादरम्यान लाखो वारकरी आणि भाविक पुण्यात दाखल होत असतात. या काळात अंधश्रद्धा, भोंदूबाबा, जादूटोणा आणि तत्सम फसव्या प्रथांबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. जनजागृतीच्या अभावामुळे अनेक नागरिक आर्थिक आणि मानसिक शोषणाला बळी पडत असल्याचेही बालवडकर यांनी प्रस्तावात नमूद केले आहे.
पालखी मार्गावरील प्रमुख ठिकाणी माहिती फलक, जनजागृती पत्रके, व्याख्याने तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणारे उपक्रम राबवून समाजप्रबोधन करण्यात येणार आहे, जेणेकरून अंधश्रद्धेमुळे होणारी पिळवणूक आणि फसवणूक रोखण्यास मदत होणार आहे.

COMMENTS