Pahalgam Terror Attack | १८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले, शुक्रवारी २३२ येणार | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Maharashtra News – (The Karbhari News Service) – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेत असून शुक्रवारी २३२ प्रवाशांसाठी विशेष विमानाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. इंडिगो कंपनीचे हे विमान शुक्रवारी दुपारी श्रीनगरवरून महाराष्ट्राकडे झेपावणार आहे. (Muralidhar Mohol)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेल्या ४८ तासांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असून विशेष विमानांची व्यवस्था करत आहे. गुरुवारी मोहोळ यांच्या प्रयत्नातून १८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले असून आज शुक्रवारी २३२ प्रवासी महाराष्ट्राकडे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या प्रवाशांना परतण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली असून राज्य सरकार या विमानांचा खर्च करणार आहे.
केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले ‘महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना आणण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू असून जम्मू ते श्रीनगर हा रस्ता बंद असल्याने काही पर्यटक जम्मू येथे अडकलेले आहेत. शिवाय रेल्वेने गेलेल्या प्रवाशांनाही रेल्वे गाड्या रद्द झाल्याचा फटका बसला असून महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना श्रीनगरमार्गे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे अजूनही जम्मू-काश्मीरच्या विविध भागातून फोन कॉल्स येत असून त्यांची व्यवस्था केली जात आहे.
COMMENTS