MP Girish Bapat | पुणं पोरकं झालं | खासदार बापट यांच्या निधनाने व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया

HomeपुणेBreaking News

MP Girish Bapat | पुणं पोरकं झालं | खासदार बापट यांच्या निधनाने व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया

Ganesh Kumar Mule Mar 29, 2023 8:08 AM

Insurance For Warkari | वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण
पुणेकरांच्या 40% कर सवलतीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार | शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे
Pune Municipal Corporation | उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुणे महानगरपालिकेचा गौरव

खा. गिरीश बापट यांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं!

-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची श्रद्धांजली

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट यांचं निधन अतिशय दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, खा. गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या.

बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले*

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मुंबई दि २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती.
सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला असेही मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात.