MLA Hemant Rasane | पुणे शहरात वाढत असलेल्या ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (GBS) च्या प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
| आमदार हेमंत रासने यांनी घेतली महापालिका अधिकाऱ्यांनी भेट
GB Syndrome – (The Karbhari News Service) – शहरात काही भागामध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ (Guillain-Barré Syndrome – GBS) या आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. हा आजार दुर्मिळ असल्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल संभ्रमावस्था आहे. या आजारामुळे रुग्णांवर होणारा परिणाम पाहता त्वरित निदान आणि उपचार मिळणे गरजेचे असून महापालिका तसेच संलग्न असणाऱ्या रुग्णालयांमध्ये माफक दरात उपचार उपलब्ध करून देण्यात यावेत, जीबीएस आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे दिसून आल्याने पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता नियमितपणे ठेवली जावी तसेच पाणी शुद्धीकरण मोहिम राबवावी, अशी मागणी आमदार हेमंत रासने (MLA Hemant Rasane) यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. (GB Syndrome in Pune)
गेली दोन दिवसांपासून पुणे शहरातील काही भागांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याची मागणी हेमंत रासने यांनी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी बी यांची भेट घेत केली आहे. नागरीकांमध्ये GBS विषयी जनजागृती करणे गरजेचे असून आरोग्य केंद्रांमध्ये या आजाराच्या निदानासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध केले जावे.
रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये GBS साठी स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी यावेळी केली
याविषयी बोलताना हेमंत रासने म्हणाले, गेली दोन दिवसांपासून पुणे शहरात जीबीएसचे रुग्ण आढळून येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, मात्र दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं पुढे आल्याने उकळून घेऊनच पाणी प्यावे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. महापालिका तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून टास्क फोर्सच्या माध्यमातून उपायोजना केल्या जात आहेत.
यावेळी मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे , सरस्वती शेंडगे, योगेश समेळ, अजय खेडेकर, आरती कोंढरे, गायत्री खडके, शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर आदी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
————-
कसबा मतदारसंघातील विविध प्रश्न संदर्भात देखील यावेळी चर्चा करण्यात आली. कचरा मुक्त कसबा अभियान यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपायोजना. मुख्य रस्त्यांवर असणारी अतिक्रमणे हटवणे, तसेच मतदारसंघात काही भागांमध्ये पाणीपुरवठा संदर्भात नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने सुरळीत व प्रेशरने पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.
COMMENTS