Keshavnagar Kharadi Bridge | केशवनगर-खराडी उड्डाणपूल | ६ किमीचा फेरा आणि अर्धा तासाचा वेळ वाचणार
| 16 ऑगस्टला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या उड्डाणपुलाचे उद्घाटन रविवार 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते केशवनगर-खराडी पूल, गोदरेज इन्फिनिटी जवळ, मुंढवा येथे हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार आहे. तसेच महापौर मंजुषा दीपक नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पुणे महानगरपालिकेने बांधलेला हा उड्डाणपूल केशवनगर ते खराडी दरम्यानच्या वाहतुकीला मोठा दिलासा देणारा ठरणार आहे.
उड्डाणपुलाची एकूण लांबी सुमारे 411.40 मीटर आणि रुंदी 24 मीटर आहे. पुलावर एकूण 7 गाळे असून प्रत्येक गाळ्याची लांबी 35.2 मीटर आहे. खराडी बाजूचा अॅप्रोच रस्ता 40 मीटर लांबीचा तर केशवनगर बाजूचा अॅप्रोच रस्ता 125 मीटर लांबीचा आहे. या पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे.
प्रकल्पाची निविदा रक्कम 23.47 कोटी रुपये होती. आतापर्यंत 23 कोटी रुपये खर्च झाला असून काम पूर्ण झाले आहे.
या उड्डाणपुलामुळे केशवनगरकडून खराडीकडे जाणाऱ्या वाहनांचा सुमारे 6 किमीचा अतिरिक्त प्रवास टळणार आहे. बायपास रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासाचा वेळ सुमारे अर्धा तास वाचणार आहे. त्यामुळे इंधनाची बचत होण्यासोबतच वायू आणि ध्वनी प्रदूषणातही घट होणार आहे.
परिणामी केशवनगर, खराडी आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुरळीत आणि वेळेची बचत करणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

COMMENTS