Aashadhi Wari 2025 | संविधान समता दिंडी बंद पडावी ! राजाभाऊ चोपदार यांचे प्रतिपादन
Palkhi Sohala 2025 – (The Karbhari News Service) – विषमता संपली तर समतेसाठी चाललेल्या संविधान समता दिंडीची गरज पडणार नाही. त्यामुळे जोवर विषमता आहे तोवर समता दिंडीची गरज आहे. भविष्यात समता संपावी आणि संविधान समता दिंडी बंद व्हावी, असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार ह.भ. प. राजाभाऊ महाराज चोपदार यांनी केले. (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala)
संविधान समता दिंडीचा प्रस्थान कार्यक्रम महात्मा फुले वाडा येथे झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे माजी अध्यक्ष अविनाश पाटील होते. परिवर्तनवादी कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे, ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या गीताली वि. म., गांधीवादी कार्यकर्ते अन्वर राजन, राष्ट्र सेवा दलाचे माजी राज्य कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, लेक लाडकी अभियानाचे प्रणव पवार, दिंडी चालक शामसुंदर महाराज सोन्नर, संयोजक विशाल विमल आदी उपस्थित होते.
समाजात अनेक वेगवेगळ्या विचार प्रवाहांचे लोक आहेत. तरी देखील आपण इतरांच्या विचारांचा आदर केला पाहिजे, असेही चोपदार महाराज म्हणाले. संतांचे विचार विषमतेच्या विरोधात होते. संताचे विचार हे समता, स्वातंत्र्य, न्यायचे आहेत. संतांचा प्रभाव देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक महापुरुषांवर होता, असे मत ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक देवरे यांनी केले.आभार दत्ता पाकिरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम संयोजनात भारत घोगरे गुरुजी, नागेश जाधव, सुमित प्रतिभा, हरिदास तम्मेवार, साधना शिंदे, समाधान महाराज देशमुख, सिद्धेश सूर्यवंशी आदी सहभागी होते.
२४ जूनला यवत ते वरवंड एक दिवस वारी
वारीतील मानवतावाद, समता आदी मूल्ये ही जाणून घेऊन ती जगण्यात वृद्धिंगत व्हावीत, यासाठी ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम सुरू केला. यंदा त्याचे बारावे वर्ष आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यंदा यवत ते वरवंड मार्गावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात चालणार आहे, अशी माहिती भारत घोगरे गुरुजी, वर्षा देशपांडे, महादेव पाटील यांनी दिली.
COMMENTS