PMC Kamgar Dindi | कामगार दिंडीत ५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग | पुणे मनपाच्या वारीत समाज प्रबोधनाचे संदेश
Pune PMC News – (The Karbhari News Service) – दरवर्षी प्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या कामगार कल्याण विभागातर्फे कामगार दिंडीचे आयोजन करण्यात आले. आळंदी ते पुणे या एक दिवसीय पायी वारी उपक्रमात महानगरपालिकेच्या विविध विभागांतील ४०० ते ५० अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. (PMC Labour Welfare Department)
कामगार कल्याण निधीतर्फे आयोजित या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे वारीसोबतच पुणे महानगरपालिकेशी संबंधित विविध समाज सुधारणा आणि प्रबोधन विषयक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात. स्वच्छता, पाणी बचत, आरोग्य, वाहतूक नियम आणि पर्यावरण रक्षण यांसारख्या विषयांवर गीत, घोषणा आणि फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
यंदाची कामगार दिंडी आळंदीहून पहाटे प्रारंभ झाली. वाटेत विठ्ठल नामाचा गजर, भजन आणि पालखीच्या ठिकठिकाणी भाविकांनी दिंडीचे स्वागत केले. दिंडीत सहभागी झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गणवेशात वारी करताना शिस्त आणि भक्तिभावाचे दर्शन घडवले.
दिंडी प्रमुख म्हणून नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी यांनी काम पाहिले. दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी कामगार कल्याण विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजन, भोजन, वैद्यकीय मदत आणि वाहतूक व्यवस्था यासाठी सहकार्य केले.

महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले की, कामगार दिंडी हा केवळ धार्मिक उपक्रम नसून कर्मचारी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे व्यासपीठ आहे. वारीच्या माध्यमातून दिले जाणारे प्रबोधन संदेश थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो.
दिंडीत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, वर्षभराच्या कामाच्या व्यापातून हा एक दिवस भक्ती आणि सेवेसाठी मिळतो. त्यामुळे पुढील वर्षीही अधिक संख्येने सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.


COMMENTS