Pune Congress | राजकीय हिंसाचारा प्रकरणी पोलिस आयुक्तांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधावा | पुणे कॉंग्रेस ची मागणी
Pune Breaking News – (The Karbhari News Service) – पुणे शहरात वारंवार होत असलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील हिंसाचाराबाबत पुणे कॉंग्रेस च्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने राजकीय हिंसाचारा प्रकरणी पोलिस आयुक्तांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधावा, अशी मागणी केली. (Pune CP Amitesh Kumar)
कॉंग्रेस ने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पुणे शहर ही या राज्याची सांस्कृतीक राजधानी म्हणून व विद्येचे माहेघर म्हणून ओळखले जाते. या शहराला खूप मोठा निरनिराळ्या क्षेत्रामध्ये वारसा आहे. या शहरातील राजकीय संस्कृती ही देखील कित्येक वर्ष राज्याला दिशा देणारी आहे. अशा परिस्थितीमध्ये गेली काही दिवस पुणे शहरामध्ये जे राजकीय हिंसाचाराचे चे प्रकार घडले आहे, ते अत्यंत निंदणीय असून शहराची प्रतिमा त्यामुळे खराब होत आहे.
१५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्र असताना काँग्रेस भवनच्या जवळ ५० फूटावर भारतीय जनता पक्षाला आंदोलनाची परवानगी दिली होती. या आंदोलनाच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनवर दगडफेक केली व त्यामध्ये काही काँग्रेसचे कार्यकर्ते व पत्रकार जखमी देखील झाले, या घटनेसंदर्भात रितसर गुन्हा हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे.
काल २३ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुढारी कार्यालयाच्या समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार हे डिबेटसाठी गेले होते. डिबेट संपल्यानंतर पुढारी कार्यालयाच्या बाहेरच त्यांच्यावर काही गुंडानी हल्ला केला व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात रितसर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार नोंदविलेली आहे.
असे वारंवार प्रकार पुणे शहरामध्ये घडत असून या संदर्भामध्ये योग्य त्या प्रकारची कार्यवाही पोलीसांकडून अपेक्षित आहेच, गुंडगिरीला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींना आणि प्रवृत्तींना वेळेतच आळा घातला नाही तर त्याचे पर्यावसन मोठ्या दुर्वैवी घटनेमध्ये होण्याची शक्यता आहे.
या सर्व घटनांचा पोलीस खात्यावर देखील सातत्याने ताण येत असून पुणे शहराचे पोलीस प्रमुख म्हणून आपण राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधावा जेणे करून अशा प्रकारच्या दुर्देवी घटना पुन् घडणार नाहीत आणि पुणे शहराच्या प्रतिमेला धक्का बसणार नाही यासाठी प्रयत्न करावा. असे निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS