Maharashtra Budget 2025-26 | दिशाही नाही, दृष्टीही नाही – हा अर्थसंकल्प तरुणांच्या भविष्यावर अन्याय करणारा आहे! – प्रथमेश आबनावे
Maharashtra News – (The Karbhari News Service) – या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि तरुणांसाठी कोणतीही ठोस तरतूद नाही. शिक्षण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, स्टार्टअप्स आणि महिला सुरक्षेसारख्या मुद्द्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी व्यक्त केली आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ३६,००० कोटींची तरतूद करण्यात आली असली, तरी ही गेल्या वर्षीच्या तुलनेत १०,००० कोटींनी कमी आहे. एवढी मोठी तरतूद करूनही प्रत्यक्षात किती लाभार्थ्यांना निधी मिळणार याबाबत सरकारने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही, त्यामुळे ही योजना देखील निवडणूकपूर्व जाहिरातबाजी ठरण्याची शक्यता आहे.
राज्याची १.३६ लाख कोटींची राजकोषीय तूट ही महाराष्ट्राच्या आर्थिक संकटाची गंभीर जाणीव करून देते. त्यातच CNG आणि निवडक EV वाहनांवर करवाढ करत सरकारने पर्यावरणपूरक वाहन धोरणालाही फटका दिला आहे.
हा अर्थसंकल्प केवळ घोषणांचा खेळ आहे – सामान्य जनतेसाठी नव्हे, लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी! असेही आबनावे यांनी म्हटले आहे.
COMMENTS