बायोमेट्रिक मशीन दुरुस्त करण्याबाबत मनपा प्रशासनाकडून लगबग!
| येत्या दोन दिवसांत स्मार्ट ओळखपत्र दिले जाणार | मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांची माहिती
महापालिका प्रशासनाकडून महापालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. बायोमेट्रिक हजेरी नसेल तर १५ तारखेपासून वेतन अदा न करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे कर्मचारी सकाळी कार्यालयात आल्यावर आणि सायंकाळी बाहेर पडताना बायोमेट्रिक मशीन वर थंब करूनच बाहेर पडत आहेत. मात्र सकाळी आणि सायंकाळी देखील थंब करताना मशीन अचानक बंद पडत होत्या. यामुळे प्रशासनाची आलोचना केली जात होती. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाकडून मशीन दुरुस्त करण्यात आल्या. शिवाय नवीन मशीन बसवण्यात आल्या. तसेच आगामी दोन दिवसात पहिल्या टप्प्यातील स्मार्ट ओळखपत्र वितरित केले जातील. अशी माहिती विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी दिली.
Aadhar Enabled Bio-Metric Attendance System” ची प्रणाली पुणे महानगरपालिकेमध्ये सूरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी आपल्या विभागातील सर्व अधिकारी/सेवकांचे बायोमेट्रिक्स होते याबाबतची खात्री करणे आवश्यक आहे. तथापि, अनेक विभागामध्ये अद्याप अधिकारी/सेवक बायोमेट्रिक्स हजेरी प्रणालीमध्ये हजेरी लावत नाही असे निदर्शनास आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसेल, त्यांचे 15 नोव्हेंबर पासून वेतन अदा करू नये. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. कर्मचारी सकाळी कार्यालयात आल्यावर आणि सायंकाळी बाहेर पडताना बायोमेट्रिक मशीन वर थंब करूनच बाहेर पडत आहेत. मात्र सकाळी आणि सायंकाळी देखील थंब करताना मशीन अचानक बंद पडत होत्या. यामुळे प्रशासनाची आलोचना केली जात होती. याची गंभीर दखल घेत महापालिका प्रशासनाकडून मशीन दुरुस्त करण्यात आल्या. शिवाय नवीन मशीन बसवण्यात आल्या. त्यामुळे कालच्या पेक्षा आज कर्मचाऱ्यांना कमी वेळ लागला.
मनपा भवन मध्ये एकूण ९ बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आल्या होत्या. नेटवर्क अभावी मशीन बंद पडत होत्या. मात्र आज त्यांची दुरुस्ती करण्यात आल्या. शिवाय ७ ते ८ नवीन मशीन बसवण्यात आल्या आहेत. शिवाय आगामी दोन दिवसात कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यातील ५०० स्मार्ट ओळखपत्र वितरित केले जाणार आहेत. त्यानंतर जसे उपलब्ध होतील तसे ओळखपत्र वितरित केले जातील. या ओळखपत्रामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे. यानुसार आधार नंबर टाकण्याची आवश्यकता भासणार नाही. फक्त थंब करावे लागणार आहे.
| श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, पुणे मनपा