पंतप्रधान संग्रहालयाला काँग्रेसचा विरोध दुर्दैवी
पुणे : ‘‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे तीन मूर्ती भवन येथे उभारण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला काँग्रेस पक्षाने केलेला विरोध हा त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या सरंजामी वृत्तीचा निदर्शक आहे. देश बदलला आहे याची जाणीव ठेऊन काँग्रेस पक्षाने आता तरी भारत हा कोण्या एकट्याची जहागीर असल्याची भावना सोडावी,’’ असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.
भांडारी म्हणाले, ‘‘पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे तीन मूर्ती भवन येथे वास्तव्य होते. तेथे देशाचे पंतप्रधान म्हणून आतापर्यंत काम केलेल्या सर्व नेत्यांच्या कार्यांचे स्मरण करणारे संग्रहालय उभारले आहे. येथे केवळ भाजपचे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मरण केलेले नाही. तर, काँग्रेससह अन्य पक्षांच्या माजी पंतप्रधानांच्या कार्याचाही गौरवपूर्ण उल्लेख आहे. त्यामुळे काँग्रेसने संग्रहालयावर टीका करून ते अन्यत्र उभारायला हवे होते, असे म्हणणे दुर्दैवी आहे.’’‘‘देशात लोकशाही असली तरी प्रत्यक्षात काँग्रेसने आणि त्यातही नेहरू गांधी घराण्याने देशावर राज्य करत राहावे, अशी काँग्रेस पक्षाची मानसिकता आहे. भारत बदलला आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत जनतेने काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याइतक्याही जागा दिल्या नाहीत. आता तरी काँग्रेसने इतर पक्षातील नेत्यांचा आदर करावा,’’ असे त्यांनी नमूद केले.
COMMENTS